डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं.. विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते हा स्वानुभव आहे. त्याचबरोबर जेष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत जमिनीवर घट्ट पाय रोवून कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. आपण जेव्हा समाजात वावरत असतो त्यावेळी मिळणारी अनुभव संपन्नता, ज्ञान आणि महत्वाचं म्हणजे लोकांचं प्रेम व त्यांचा विश्वास शब्दांत मांडू शकतच नाही..
भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मंत्री या प्रवासात कल्याण डोंबिवली शहरं, ठाणे जिल्हा आणि आता एकूणच महाराष्ट्र राज्याच्या विविध विकास योजनांचा एक घटक, साक्षीदार राहिलो त्याचं मनापासून समाधान आहे. या दरम्यान पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, संस्कृती अशा अनेक विषयांवर काम करताना स्वतःची क्षमता तपासता आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीच्या भक्कम पायावर व भारतीयत्व संकल्पनेला मानणाऱ्या थोरामोठ्यांचे मार्गदर्शन तसेच पराकोटीचे वैचारिक मतभेद असणाऱ्या सर्वांशीच सलोख्याचे नाते निर्माण झाले. मुळात हे नाते विश्वासाचे असल्याने आता आणखी एक झेप घेण्यास आपण उत्सुक आहोत. ही झेप ध्येयाची, क्षमतेची, प्रगतीची आणि परस्परांच्या स्नेहाची ठरो. आपण माझ्यावर विश्वास दाखवला, वृद्धिंगत केला त्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन हा शब्द देतो…
स्वा. सावरकरांशी भावबंध : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ध्येयवादी नेतृत्व अजरामर आणि अतुलनीय आहे. “न कि घेतले अम्ही व्रत हे अंधतेने” म्हणत स्वातंत्र्य संग्रामात आयुष्याची आहुती देणाऱ्या या सूर्याला ब्रिटिश साम्राज्य निस्तेज करू शकले नाही, तो निष्फळ प्रयत्न मणी शंकर अय्यर याने केला. अंदमान सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या कवितेची कोनशीला हटवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार त्याने केला. स्मारक हटवून विचार कधीच पुसता येत नाहीत हे त्याला दाखवून द्यावे आणि सावरकरांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहावी म्हणूनच २८ मे २०१४ रोजी डोंबिवलीत अखंड सावरकर ज्योत पेटवावी हा संकल्प केला आणि अंमलात आणला. सावरकर आणि माझे भावबंध आणखी घट्ट झाले. माझ्या लोकप्रतिनिधीपदाची सुरुवात सावरकर या नावापासून सुरू झाली आहे. २००५ साली सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आलो. सावरकर रोडवर सावरकर उद्यानात माझं कार्यालय सुरू झालं आणि सावरकरांच्या विचारांचा प्रखर अग्नी २४ तास ७ दिवस अहोरात्र गेले ४ वर्षे सुरू आहे या मागेही ध्येयासक्ती आहेच. सावरकरांचे विचार त्यांच्या ज्योतीच्या द्वारे समाजात दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरावे.
सिद्धहस्त लेखक मार्क ट्वेनचे एक अजरामर वाक्य इतिहास बनले आहे. तो म्हणतो “सत्य हे कल्पनेहून सुरस असतं”. माझ्याबाबतीत ते तंतोतंत खरं ठरलंय. तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात जन्म आणि मुंबईत भांडुपमध्ये बालपण गेल्यानंतर मी आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत आलो. डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यतः रा.स्व. संघ आणि भाजपाचे भारतीयत्वाचे देशभक्त संस्कार झाले. राजकीय स्वार्थापेक्षा देशहित प्रिय असलेली विचारसरणी नसानसात भिनली आणि देश प्रथम…नंतर पक्ष… स्वतः शेवटी…. ही आयुष्याला कलाटणी देणारी भाजपाची विचारधारा मनावर बिंबवली गेली.
२००२ साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदावर नेमणूक झाली. २००५ साली नगरसेवक म्हणून निवडून आलो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद मिळाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. २०१४ साली कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. तर २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या ४ खात्यांची जबाबदारी सांभाळतो आहे. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत आहे.
गेल्या १८-२० वर्षांमध्ये भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांना काय समस्या आहेत त्या अनुभवत होतो. डोंबिवलीत तर नागरी समस्यांचं न संपणारं दुष्टचक्र होतं. आजही ते संपलं आहे हे मी म्हणणार नाही. पण केवळ भाजपाचे मतदार म्हणून या आधीचे शासनकर्ते आपल्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. ते मी थांबवलं.
डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी संघर्ष केला प्रसंगी कोर्टात खेचले. केडीएमसी, एमआयडीसी, एमएमआरडीए, मध्य रेल्वे, महावितरण यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासकीय खाती यांच्याविरोधात जन आंदोलन उभारलं. २०१४ साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने “साफ नियत सही विकास” हेच विकासाचे धोरण ठेऊन प्रगतीची घोडदौड सुरू केली त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आपले सरकार स्थापन झाल्यापासून प्रगतीच्या प्रक्रियेने वेग पकडला आहे.
विश्वास हीच पुण्याई : लोकप्रतिनिधी पाठपुरावा आणि अथक काम करण्याची ऊर्जा यासाठी वचनबद्ध असला पाहिजे या मताचा मी आहे. सकारात्मकतेने काम करताना चूका होणे, आश्वासनांची पूर्तता होण्यास विलंब होणे अशा नकारात्मक गोष्टीही घडणारच. पण गणितातदेखील मायनस मायनस प्लस होतं अगदी तसंच नकारात्मकता एकत्र करून सकारात्मक पध्दतीने काम करावं हीच शैली आत्मसात केलेली आहे. सकारात्मकतेने सतत काम करत राहिल्यानेच लोक विश्वास ठेवतात यासारखी पुण्याई असू शकत नाही असं मी मानतो. त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी जे परिश्रम, कष्ट आणि प्रामाणिकपणाने कर्म करावे लागेल ते मी करत आलो आहे आणि या पुढेही करत राहीन.
Leave Your Comment